Thursday, June 23, 2011

२०. पुन्हा स्मशानी


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले
दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले


अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!
करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!


कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!
सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!


–  सुरेश भट

१९. बरे नाही


हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही


आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…


-सुरेश भट

१८. उशीर


हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!


आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा.. 
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!


होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी. 
मातीत पावलांचे काही ठसेच होते!


- सुरेश भट

१७. एल्गार


अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही


येथे पिसुन माझे काळीज बैसलों मी
आत्ता भल्याभल्यांचा हातात डाव नाही


हे दुख राजवर्खी...हे दुख मोरपंखी...
जे जन्मजात दुखी त्यांचा निभाव नाही


त्यांना कसे विचारू - कोठे पहाट झाली?
त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही


जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तनाव नाही


झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही


गर्दित गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मडयाला आता उपाव नाही


जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
संतांतही घराच्या राखेस भाव नाही


उचारणार नाही कोणीच शापवाणी...
तैसा  ऋषिमुनिंचा लेखी ठराव नाही


साद्याच माणसांचा एल्गार येत आहे...
हा थोर गांडूळाचा भोंदू जमाव नाही !


ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

Monday, June 13, 2011

१६. मी नाही!

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही

जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!

अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही

धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!

दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!

विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!

१५. हा असा चंद्र


हा असा चंद्र.. अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी

चेहरातो न इथे ही न फुलांची वस्ती!
राहिले कोण अत सांग झुरायासाठी

कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी


आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुठे आत शिरायासाठी?

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू?
ये गडे उभा जन्म चिरायासाठी!


काय आगीत कधी आग जळाली होती
लोक नेतील मला खोल पुरायासाठी!

१४. अखेरचे थेंब


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
आताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!

१३. आता असे करु या!


नाही म्हणायला आता असे करु या
प्राणात चंद्र ठेवू-हाती उन्हे धरु या

आता परस्परांची चाहूल घेत राहू
आता परस्परांच्या स्वप्नात वावरु या

नेले जरी घराला वाहुन पावसाने
डोळ्यातल्या घनांना हासून आवरु या

गेला जरी फुलांचा हंगाम दुरदेशी
आयुष्य राहिलेले जाळुन मोहरु या

ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे
माझ्यातुझ्या मिठीने ही राञ मंतरु या

हे स्पर्श रेशमी अन् हे श्वास रेशमाचे
ये! आज रेशमाने रेशीम कातरु या

१२. आकाश उजळले होते


इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

११. बोलणी


आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

१०. मेघ


पुन्हा तेजाब दु:खाचे उरी फेसाळुनी गेले
पुन्हा गाणे तुझे ओठावरी घोटाळुनी गेले

मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका ?
मघाशी कोणते डोळे मला ओवाळुनी गेले ?
कराया लागलो जेव्हा तुझी स्वप्नासवे चर्चा
खुलासे भूतकाळाचे मला गुंडाळुनी गेले
उपाशी प्रश्न हा माझा उभा आहे तुझ्या दारी
'कसे तारुण्य ते होते मला जे टाळुनी गेले ?'
पुरे आता पुरे चर्चा सुळाच्या मोजमापाची
बळीचे रक्तही येथे कधीचे वाळुनी गेले
कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या ?
कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले
असा काही आला मला जगायाचाच कंटाळा
अता आयुष्यही माझे मला कंटाळुनी गेले
मला तू सांग आकाशा ... तुझा आषाढ कोणाचा ?
अरे ते मेघ होते जे घराला जाळुनी गेले

९. ओठ


तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?
आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?
बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?

८. दर्जेदार


ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!
हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता!
गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते...
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!
ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)
स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!
गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता!
लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)
चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा..तो चोर अब्रुदार होता!
पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा
लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता!

७. संक्षेप


हा ठोकरून गेला, तो वापरून गेला..
जो भेटला मला तो वांधा करून गेला!
वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला
माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!
केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला
बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!
कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"
आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला!

६. पाठ


सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!

हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती..
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?

ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)

मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?

जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!

वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!

वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!

५. वय निघून गेले


देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

ह्रद्याचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले

४. यार हो


सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
(मी कुणाचा गळा कापला यार हो)